या वर्षीच्या साहित्य सम्मेलनाने सुरुवात तर मोठी झकास केली आहे. पदार्पणातच षटकार! मागच्या वर्षी सांगलीच्या संमेलनाचा स्कोअर सुद्धा काही कमी नव्हता.
१) अध्यक्षपदासाठी मीना प्रभू आणि हातकणन्गलेकर यांची ज़बरदस्त लढाई!
२) मीना प्रभू पैसे वाटत असल्याचा आरोप
३) हातकणन्गलेकर जिंकल्यानंतर मतांचा फेरफार झाल्याचा मीना प्रभूंचा आरोप
४) राष्ट्रपति उदघाटन करणार म्हणून माजी अध्यक्षांचा बहिष्कार
५) यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल-कलश नव्हे तर तांब्या आणला असं एक खळबळजनक विधान
आज सांगली च्या सम्मेलनामधलं एवढंच आठवतंय. तिथे काय परिसंवाद झाले, काय ठराव झाले, त्यांचं पुढे काय झालं - काहीही आठवत नाही. नाही म्हणायला स्त्री लेखकांच्या लेखनाबद्दल काहीतरी परिसंवाद झाला होता हे त्याबद्दल जो वाद नंतर निर्माण झाला होता त्यामुळे आठवतंय.
या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या संमेलनाला काहीतरी जोरकस, मसालेदार सादर करणं आवश्यक होतंच, आणि ते त्याने अगदी झोकात सादर केलंय!
असो.
खरं तर अमेरिकेत सम्मेलन होणार हे ऐकून मलाही वाईट वाटलं होतं. राग आला होता. काहीतरी निसटून चाललंय असं. पण नंतर ज़रा आणखी विचार केला आणि वाटलं, काय फरक पडतो सम्मेलन कुठेही झालं तरी. तसंही संमेलनाचा सामान्य माणसाच्या आयुष्याशी कुठे काय सम्बन्ध राहिला आहे. किंवा खरं तर साहित्याचाच कुठे फारसा सम्बन्ध राहिलाय जीवनाशी! अगदी सम्मेलन रत्नागिरी ला घ्यायचं ठरलं तरीही त्याने मराठी साहित्याचं असं काय भलं होणार आहे!
आज मराठी साहित्याला अशा तकलादू सम्मेलनं आणि उत्सवानी काहीही ऊर्जा मिळत नाही हे सत्य आहे. त्याची मरगळ झटकायला गरज आहे एका लोकाभिमुख चळवळीची! लोकांनी वाचावं यासाठी, त्यासाठी गावोगावी वाचनालाये निघावीत यासाठी प्रयत्न करणारी, समाजाच्या सर्व स्तरांतल्या लेखकांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणारी, सकस साहित्य प्रकाशित करणारी चळवळ! परदेशातल्या सम्मेलानाबद्दल निषेध नोंदवणे ठीकच आहे, पण वांझ आहे!
Wednesday, June 25, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
absolutly right
Post a Comment