Monday, June 30, 2008

काश्मीर

काश्मीर मध्ये जे काही चालू आहे ते वाचून वाईट वाटतं. काय गरज होती जम्मू काश्मीर सरकारला हे सगळं करायची! आत्ता कुठे वातावरण थोडं शांत होऊ लागलं होतं. मधेच कशासाठी हे जमीन प्रकरण? पर्यटकांची सोय व्हायला हवी हे ठीक आहे, पण ते काम पर्यटन विकास मंडळ किंवा स्थानिक लोकांवर सोपवता येत नव्हतं का? मंदिराच्या ट्रस्टला जमीन देण्याचं काय कारण? आता पुन्हा सरकारने माघार तर घेतली आहे, पण दरम्यान वातावरण गढूळ व्हायचं ते झालंच! स्थानिक लोकांचा सरकार वरचा अविश्वास आणखी दृढ़ झाला, पर्यटकांचे हाल झाले. ज्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती त्यांनी ती घेतली.
आणि आता भाजपा/शिवसेनेनी जम्मू मध्ये दंगा सुरु केला आहे. आशा आहे की हे फार काळ चालणार नाही. आणि पुन्हा सगळं शांत होईल. पण खरंच, सामान्य लोकांचा जराही विचार न करणारया सरकारांचं आणि एकूणच सगळ्या राजकीय पक्षांचं काय करावं?

Wednesday, June 25, 2008

साहित्यसम्मेलन

या वर्षीच्या साहित्य सम्मेलनाने सुरुवात तर मोठी झकास केली आहे. पदार्पणातच षटकार! मागच्या वर्षी सांगलीच्या संमेलनाचा स्कोअर सुद्धा काही कमी नव्हता.
१) अध्यक्षपदासाठी मीना प्रभू आणि हातकणन्गलेकर यांची ज़बरदस्त लढाई!
२) मीना प्रभू पैसे वाटत असल्याचा आरोप
३) हातकणन्गलेकर जिंकल्यानंतर मतांचा फेरफार झाल्याचा मीना प्रभूंचा आरोप
४) राष्ट्रपति उदघाटन करणार म्हणून माजी अध्यक्षांचा बहिष्कार
५) यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल-कलश नव्हे तर तांब्या आणला असं एक खळबळजनक विधान
आज सांगली च्या सम्मेलनामधलं एवढंच आठवतंय. तिथे काय परिसंवाद झाले, काय ठराव झाले, त्यांचं पुढे काय झालं - काहीही आठवत नाही. नाही म्हणायला स्त्री लेखकांच्या लेखनाबद्दल काहीतरी परिसंवाद झाला होता हे त्याबद्दल जो वाद नंतर निर्माण झाला होता त्यामुळे आठवतंय.
या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या संमेलनाला काहीतरी जोरकस, मसालेदार सादर करणं आवश्यक होतंच, आणि ते त्याने अगदी झोकात सादर केलंय!
असो.
खरं तर अमेरिकेत सम्मेलन होणार हे ऐकून मलाही वाईट वाटलं होतं. राग आला होता. काहीतरी निसटून चाललंय असं. पण नंतर ज़रा आणखी विचार केला आणि वाटलं, काय फरक पडतो सम्मेलन कुठेही झालं तरी. तसंही संमेलनाचा सामान्य माणसाच्या आयुष्याशी कुठे काय सम्बन्ध राहिला आहे. किंवा खरं तर साहित्याचाच कुठे फारसा सम्बन्ध राहिलाय जीवनाशी! अगदी सम्मेलन रत्नागिरी ला घ्यायचं ठरलं तरीही त्याने मराठी साहित्याचं असं काय भलं होणार आहे!
आज मराठी साहित्याला अशा तकलादू सम्मेलनं आणि उत्सवानी काहीही ऊर्जा मिळत नाही हे सत्य आहे. त्याची मरगळ झटकायला गरज आहे एका लोकाभिमुख चळवळीची! लोकांनी वाचावं यासाठी, त्यासाठी गावोगावी वाचनालाये निघावीत यासाठी प्रयत्न करणारी, समाजाच्या सर्व स्तरांतल्या लेखकांना लिहिण्यासाठी प्रोत्साहन देणारी, सकस साहित्य प्रकाशित करणारी चळवळ! परदेशातल्या सम्मेलानाबद्दल निषेध नोंदवणे ठीकच आहे, पण वांझ आहे!