Monday, September 15, 2008

कशासाठी पोटासाठी! हैतीची कहाणी

नेटवर काहीतरी शोधत असताना मला ही बातमी दिसली. http://news.nationalgeographic.com/news/2008/01/080130-AP-haiti-eatin.html हैती या देशामध्ये लोक मातीच्या कुकीज खाऊन जगत आहेत. वाचून अंगावर शहारे आले. माणसाने एवढी प्रगती केली म्हणे! आणि तरीही सगळ्या माणसांची ही मूलभूत गरज आपण भागवू शकत नाही? यापेक्षा मग जंगलात रहाणारा आदिमानव बरा होता की! निदान खाण्यासारख्या गोष्टी तरी खात होता तो!

ही अशी वेळ का आली हैती मधल्या लोकांवर? या प्रश्नाचा थोड़ा शोध घेतला आणि ब-याच धक्कादायक गोष्टी वाचायला मिळाल्या. हैती हा एक छोटासा कॅरेबियन देश. 1980 सालापर्यंत हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. स्वत:पुरते अन्नधान्य पिकवत होता. अन्नधान्याची आयात करण्यावर मोठ्या प्रमाणात कर असल्याने आयातीचे प्रमाण अतिशय कमी होते. देश मुख्यत: कृषिप्रधान होता. लोक छोट्या गावांमध्ये शेती करून रहात होते.

1980 साली या देशाने neoliberal - नव उदारतावादी धोरण स्वीकारलं. आयातीवरचे कर मोठ्या प्रमाणात कमी करून देशांतर्गत बाजारपेठ बाहेरच्या कंपन्यांसाठी खुली केली. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात अमेरिकन तांदूळ आयात होऊ लागला. हा तांदूळ स्वस्त होता. बघता बघता त्याने देशांतर्गत पिकवल्या जाणा-या तांदळाला बाजारातून हद्दपार केले. तांदूळ पिकवणारे शेतकरी देशोधडीला लागले. त्यांचं उत्पादनाचं साधन संपलं. ते मोठ्या प्रमाणात शहरात येऊन झोपडपट्ट्यांमध्ये राहू लागले.


2000 सालापर्यंत जवळजवळ 80% तांदूळ अमेरिकेतून आयात होऊ लागला. त्यामुळे अर्थातच त्याच्या किंमती थेट डॉलरशी जोडल्या गेल्या. म्हणजे हैतीच्या चलनाचा डॉलरच्या तुलनेत भाव काय आहे यावर या किंमती अवलंबून राहू लागल्या. आणि या चलनाच्या घसरणीबरोबर तांदळाचे व इतर जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढू लागले. अशात 2007-08 मध्ये जागतिक बाजारपेठेत अन्नधान्याचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला. जगभर सर्वच प्रकारच्या अन्नधान्याच्या किंमती खूपच वाढल्या. आधीच खूप नाजूक झालेली हैतीची परिस्थिती 'न घर का न घाट का' अशी झाली. देशात तर काही पिकत नाही, आणि बाहेरून विकत घेता येईल इतके पैसे नाहीत. अशा स्थितीमध्ये लोकांपुढे माती खाण्यावाचून काही पर्याय राहिला नाही.

हैती मध्ये मार्च-एप्रिल 2008 मध्ये अन्नधान्याच्या प्रश्नावरून खूप निदर्शने आणि दंगली झाल्या. या नंतर किंवा खरे तर आधीपासूनच हैती मध्ये अनेक NGO काम करत आहेत. या NGO मुख्यतः बाहेरून येणारे अन्नधान्य स्वस्त दरात लोकांपर्यंत पोचवायचं काम करतात. काही लोकांच्या मते हैतीच्या या प्रश्नावर मूलभूत तोडगा काढण्यामध्ये या NGO एक अडथळाच आहेत. ( http://www.haitianalysis.com/agriculture/haiti-once-vibrant-farming-sector-in-dire-straits ) त्यांना बाहेरून येणा-या मदतीमध्ये जास्त रस आहे. हैतीला पुन्हा स्वयंपूर्ण करण्यामध्ये नव्हे. खरे तर सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचा NGO हा उपायच नव्हे. ते पुन्हा फक्त सरकारी धोरणे बद्लूनच सुटू शकतात.

गेल्या काही वर्षात जगभरात जवळजवळ सर्वच देशांनी या नव उदारता वादी धोरणांचा स्वीकार केला आहे. माहीत नाही आणखी किती देश असेच उध्वस्त होत आहेत, होणार आहेत!

--------------------------------------------------------------------------------------------

जाता जाता - हैती बद्दल वाचताना एका अतिशय भयंकर अशा घटनेबद्दल वाचलं. हैती मध्ये एके काळी डुक्कर पाळण्याचा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून लोक करत असत. 1980 साली अमेरिकन सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या हैतीच्या सरकारने अमेरिकेतील पोर्क उद्योगाच्या दबावाखाली 'Swine Flue' नावाच्या एका डुकरांच्या रोगाचे उच्चाटन करण्याचा बहाणा करून देशातली सर्व डुकरे मारून टाकली. (http://www.grassrootsonline.org/news-publications/newsletters/grassroots-online/grassroots-online-april-2008) देशातील लाखो लोकांचा परंपरागत व्यवसाय बुडाला.

ही आहे खुल्या बाजाराची व्यवस्था!

1 comment:

Prashant said...

धक्कादायक !!!